Sunday 23 February 2014

महासत्तेची संरक्षण सिद्धता

संरक्षण क्षेत्रात भारताची सध्यस्थिती चांगली असली तरी संरक्षण सिद्धतेसाठी आणि रोजच्या रोज जगभरात होणाऱ्या संशोधनामुळे सतत तयार राहावे लागते, भारताच्या संरक्षण कार्यक्रमाविषयी आज पाहूया,

संरक्षण सिद्धता- सुरक्षितता ही विकासासाठीची पूर्वअट आहे आणि न्यायसंगत विकासातून स्थिर आणि सुरक्षित समाजाची हमी मिळते. कोणत्याही देशाच्या विकासासोबतच त्या देशाचे भूराजकीय स्थानही मजबूत होते. हाच नियम भारताच्या बाबतीतही खरा ठरतो. जो पर्यंत देशाच्या बाह्य सीमा सुरक्षित नसतील किंवा देशांतर्गत शांतता नसेल तोपर्यंत त्या देशाच्या विकासाला पोषक वातावरण निर्माण होऊ शकत नाही. भारताच्या बाह्य सीमांचा विचार करता एकीकडे पाकिस्तान आहे तर दुसरीकडे चीन. देशात शांततापूर्ण वातावरण राहावे, कोणी आपल्या देशावर आक्रमण करू नये. केल्यास ते परतविण्याचे सामर्थ्य आपल्या लष्कराकडे यावे, यासाठी आपणास सतत जागरूक राहावे लागते. 
भारताच्या संरक्षण दलाचे तीन भाग पडतात. भूदल, नौदल, वायूदल.

भूदल -
अमेरिका आणि चीननंतर भारताचे लष्कर हे जगातील तिसऱ्या  क्रमांकाचे  मोठे लष्कर आहे. सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत भारतीय भूदलाचे महत्व वाढले आहे. भारताच्या सीमांचे रक्षण करणे आपल्या सैन्यदलाचे कर्तव्य आहे. केवळ सीमांचे रक्षण करण्यापुरता अवलंबून न राहता देशात वेळोवेळी उदभवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी जनतेची सुटका करणे. तसेच देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका उदभाविल्यास त्यावेळी स्थानिक प्रशासनाच्या मदतीला धावून जाण्याचे कामदेखील आपल्या जवानांना पार पडावे लागते.
 नौदल-भारतीय नौदल जगातले पाचवे मोठे नौदल आहे. हिंदी महासागराभोवतालचे भारताचे स्थान आणि या भागातील आपली परिणामकारकता यामुळे भारतीय नौदलाने शांतता, स्थैर्य आणि संरक्षणासाठी नावलौकिक मिळविला आहे.
वायुदल-भारताचे वायुदल जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे वायुदल आहे. भारतीय वायुदलाने 'गरुड कमांडो फोर्स' या नावाने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. संकटसमयी सैन्य पोहचवणे, शोधमोहीम हाती घेऊन संकटात अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे, त्याचप्रमाणे आपत्ती काळात व्यवस्थापन कार्यात मदत करणे अशी कामे ह्या विशेष दलाकडून पार पडली जातात.  भारतीय वायुदलातील सर्व महत्वाच्या पदांवर महिलांनाही संधी उपलब्ध आहेत.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना(डीआरडीओ) देशाच्या संरक्षण सिध्दतेसाठी संशोधन कार्य करते. 'अग्नी-५' च्या रूपाने भारताकडे आज आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे, ज्याच्यात ५००० किमी पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे भारताकडे 'ब्राह्मोस' हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते पाणबुडी, युद्धनौका, युद्धविमाने आणि जमिनीवरून डागता येते. ब्राह्मोस हे जगातील सर्वात जलद क्षेपणास्त्र असून त्याची मारक क्षमता २९० किमी पर्यंत आहे. यासोबतच सूर्या(क्षमता ५०००-१००००किमी) हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र भारतीय लष्करात सामील झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर इतक्या दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र असणारा भारत हा जगातील चौथा देश होईल. भारतीय लष्कराकडे अर्जुन आणि भीष्म (T-90M) यांसारखे रात्रीच्यावेळी दृश्य दाखविणारे, तीव्र उतार चढू शकणारे, वाळवंट पार करू शकणारे रणगाडे आहेत. भारत जगातील त्या पाच देशांपैकी आहे ज्यांच्याकडे अण्वस्त्रधारी पाणबुडी आहे. 

देशाच्या सीमांप्रमानेच देशाच्या अंतर्गत भागात देखील वारंवार हिंसक घटना घडत असतात. यांमध्ये नक्षलवाद, दहशतवाद, जातीय दंगे अशा घटनांचा समावेश होतो. देशांतर्गत सुरक्षिततेसाठी प्रत्येक राज्याची पोलिस यंत्रणा असते. त्याबरोबर केंद्रीय राखीव पोलिस दल, शीघ्र कृती दल, आसाम रायफल्स, राष्ट्रीय सुरक्षा दल, होम गार्ड, दहशतवाद विरोधी पथक, इंडो-तिबेट बोर्डर फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा फोर्स अशा विविध सशस्त्र दलांचे जवान देशात शांतता टिकवून ठेवण्याचे काम करत असतात. बिहारच्या गरीब शेतकऱ्यांना जुलमी जमिनदारांपासून  मुक्त करण्यासाठी जन्माला आलेल्या नक्षलवादाच्या चळवळीने आज अर्ध्याहून अधिक देशाला भयग्रस्त करून सोडले आहे. नक्षलवाद ही आज एक खूप मोठी समस्या देशासमोर आ वासून उभी आहे. भीती तंत्राचा वापर करून लोकांचा शासन यंत्रणेवरील विश्वास कमी करणे अथवा धर्म, वंश इत्यादींच्या आधारे लोकांमध्ये आपले आणि परके अशी परस्पर द्वेषाची भावना वाढविणे, यामाध्यमातून दहशतवाद ही एक आणखी समस्या देशासमोर आहे. दहशतवादाने बळी घेतलेल्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत २००७ मध्ये चौथ्या तर २००९ मध्ये सहाव्या स्थानी होता. वैश्विक शांतता निर्देशांक-२०१३ ( global peace index-2013) नुसार भारतचा जगातील १६२ देशात १४१ क्रमांक लागतो. देशाचे परकीय आक्रमकांपासून संरक्षण व्हावे म्हणून एकीकडे आपण अग्नी-५, पृथ्वी अशी क्षेपणास्त्रे बनवीत असतांना देशाच्या अंतर्गत भागत दहशतवादामुळे होणारी हानी देखील आपण अनुभवत आहोत. . उद्याची महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशाला असे चित्र शोभणारे नाही.

भारताकडे अण्वस्त्र आहेत मात्र भारताने अण्वस्त्र केवळ संरक्षणासाठी धारण केली असून आपण त्यांचा पहिले वापर करणार नाही, त्याचप्रमाणे ज्या देशांकडे अण्वस्त्र नाही त्या देशांविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करणार नाही असे, भारताचे अधिकृत धोरण आहे.  भारताने कायमच इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर केला आहे.  त्यामुळे भारताने कधीही कोणत्या देशावर आक्रमण केलेले नाही, भारताची संरक्षण सिद्धता केवळ 'स्व-संरक्षणार्थ' आहे.


No comments:

Post a Comment